कविता- 🌷 " प्रितीची रंगत " तारिख - ३१ जुलै २०१५
कविता- 🌷 " प्रितीची रंगत "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - ३१ जुलै २०१५
वेळ - संध्याकाळी ६ वाजून ९ मि.
पावसाचं आणि धरणीचं,
झालं कडाक्याचं भांडण ...
हिरमुसलेल्या धरणीचं मग
सुरुच झालं रुसणं-फुगणं ...
"कधीच नाही भेटणार तुला,"
तणतणत पाऊस गेला सांगून ...
त्यावर धरणी म्हणाली त्याला,
"नंतर मुकाट्यानं येशील मागून"...!
रागा-रागाने पाऊस आपले, घेऊन गेला ढग
"म्हणाला आता जिरवीन, धरेची सगळी रग" !
रागावून बसली धरणी, सुकून गेल्या वृक्ष-वेली...
मग तिच्या सौंदर्याची, पार रयाच की हो गेली ..!
तिचं असं रूप पाहून, पावसाला आलं भरून ...
"काय असतो उपयोग, उगीचच भांडण उकरुन" ..!
मनातल्या मनात आतून, धरणी खूप होती झुरंत ...
"पावसा, ये ना रे धावंत", मनी याचना होती करंत ...!
शेवटी न राहावून, पावसानं मग ढग केले गोळा ...
थाऱ्यावर नव्हते चित्त, त्याचा भाव साधाभोळा ...!
वाऱ्यावर स्वार होऊन, जलद आला तो तिच्यासाठी
बिलगताच धरणीला, लाजून पुरती गंधाळली माती ...!
त्याच्या स्पर्शाने चिंब-चिंब, तिचे शहारले सारे अंग ...
पुन्हा शोभला धरेवर, तिचा हिरवा-हिरवा-गार रंग ...!
धरणी म्हणाली पावसाला,"पुन्हा कधीच नको रे भांडू" ...
"विरहात सख्या उगा, पुन्हा माझे असे अश्रू नको सांडू" ...!
"लुटुपुटुचं भांडण"पाऊस म्हणे, गालातल्या गालात हसंत...
कधीमधी प्रितीची वाढवी रंगत-त्यात दडलीय् खरी गंमत...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment