कविता : " न भूतो न भविष्यति "
कविता : 🌷" न भूतो न भविष्यति "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : १९ फेब्रुवारी २०२३
वेळ : ११ वाजून १८ मि.
मुघल शासकांच्या जाचाखाली रयतेची पार गेली होती रया,
अत्याचारांच्या भीतीने घराबाहेर पडतच नव्हत्या आयाबाया !
रात्रं-दिवस देवाला साकडं "भूतलावर ये आणि कर बाप्पा दया"
१६३० साली शिवनेरी किल्ल्यावर आनंदाची झाली आतिशबाजी !
देवी शिवाईच्या कृपेनं पुत्र-रत्न-झालं म्हणून नाव ठेवलं शिवाजी !
माता जिजाऊंनी शिवरायांवर सुसंस्कार करुन खरी मारली बाजी
दादोजी कोंडदेवांनी युद्धकला, घोडेस्वारी, राजकारणात केलं तरबेज
गुरु समर्थांनी स्वधर्म, मनोबल अन् गनिमी काव्याचे शिकविले डावपेच !
जिजाऊंनी आदेश दिला, कर्तव्य-पालन करुन अन्याय करणार्यांना ठेच !
लुटूपुटूच्या खेळात बाल-शिवाजी मावळ्यांचा नेता बनून किल्ला करी सर
पुढे प्रत्यक्षात दर्याखोर्यात शर्थीने लढून कित्येक किल्ले केले त्यांनीच सर
"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" असं म्हणतात, ते शंभर टक्के खरं !
'तोरणा' किल्ला जिंकून मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ भक्कमपणे रोवली
धर्मांध मुघल शासकांच्या अघोरी अन्यायांतून आम-जनतेची सुटका केली
प्रसंगी निडरपणे सामोरे जाऊन, कावेबाज शाहिस्तेखानाची बोटंच छाटली !
कट-कारस्थान करुन हल्ले करणार्या अफझल खानाला यमसदनी धाडले
मराठा साम्राज्यावर चढाई करणार्या प्रत्येक शत्रूंच्या सैन्याला पाणी पाजले
शिवबाची यशस्वी वाटचाल पाहून मोगल बादशहाचे चांगलेच धाबे दणाणले !
६ जून १६७४ रोजी शिव-राज्याभिषेक-सोहळा पूर्ण थाटामाटात संपन्न झाला
महाराजांनी यशाच्या श्रेयाचा संपूर्ण कलश मातोश्री जिजाऊंना दिला !
अन् समर्थांच्या कापडाला साम्राज्याचा भगवा झेंडा करुन अत्युच्च मान दिला !
अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात "न भूतो न भविष्यति" अशी कार्यसिद्धी
जोवर आकाशात सूर्य-चंद्रादि-ग्रह-तारे आहेत तोवर महाराजांची दिगंत किर्ती,
पिढ्यान्-पिढ्यांना अभिमानानं, हिरीरीनं यापुढेही देतच राहील अखंड स्फूर्ती !
पिढ्यान्-पिढ्यांना अभिमानानं, हिरीरीनं यापुढेही देतच राहील अखंड स्फूर्ती !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Comments
Post a Comment